Monday, 11 January 2016

खादाडी पुण्यातली ९० च्या आधीची ..
भाग १ 
पुण्याच्या पवित्र गंगा जमुना ,अर्थात मुळामुठेच्या पाण्यावर पोसल्या गेलेल्या पुणेकरांचा अंगभूत सडेतोडपणा ,ज्याला उर्वरित महाराष्ट्रातली तमाम जनता कुचेष्टेनी ‘खवचटपणा’ असे म्हणते ;
तो जास्त प्रसिद्ध? 
का..ज्या पुण्याच्या प्रशंसेला पात्र ठरून चितळेंच्या बाकरवडीनी पुढे साता समुद्रापार कीर्ती मिळवली ति जास्त प्रसिद्ध ?सांगणं अवघड आहे .
त्याचं कारण आहे. पुणेकर आणि खाण्याच्या पदार्थांचे असे काही मेतकुट जमलेलं आहे,कि त्यातून एकाला वेगळ करणं कुठल्याही बल्लावाचार्यालाही शक्य नाहि.
पुण्यात सुगरण गृहिणीची,बल्लवांची काहीच कमी नाहि.त्यांना शिकवणाऱ्या फूडक्राफ्ट,भारती,टिळक महाराष्ट्र विद्यापीठसारख्या नामांकित संस्था,क्लासेसचीही कमी नाही.अगदी पुरुषांना सगळा स्वयंपाक शिकवणाऱ्या मेधा गोखले बाईंचा क्लासही तुम्हाला फक्त पुण्यातच सापडेल.तरीही गेल्या काही वर्षात पुण्यात,शब्दशः शेकडोंच्या संख्येनी सुरु झालेल्या हॉटेलांच्या बाहेर,दररोज हजारो पुणेकर आपापल्या पाकिटातून,वॉलेटमधून किवा पर्सेस आणि क्लचमधून पैसे भरून ज्या पद्धतीनी ताटकळत उभे असतात त्याची तुलना खर म्हणजे गुरुद्वाराच्या बाहेर सच्च्या भाविकांनी थाळा घेऊन लंगरमध्ये रांगेत उभ राहावं त्याच्याशीच व्हायला हवी .
हे सगळं झालं कधी?इथे रोज रांगा लावायचं कारण काय ?किवा पुण्याबाहेरची जनता म्हणते तसं पुण्यातल्या लोकांच्या कडे स्वयपाक करतच नाहीत का?
असल्या समाजशास्त्रीय कारणात शिरायला आम्ही(सच्चे पुणेकर असूनही) तत्वज्ञानी बिलकुलच नाहि.
आम्ही दिवसातले बर्याच वेळ असतो घराबाहेर,त्यातून आम्हाला लागते रोज भूक. तुम्ही म्हणाल ति काय उर्वरित महाराष्ट्राला नसते का?तर असते आणि असुदेत.त्याचा आमचा काही काहीय्येक संबंध नाहीये.पुणेकरांना आपापली कारणे पटतात आणि पुरतातदेखील .
आणि तसंही न पुरायला ति कारणं म्हणजे काही रोजची वामकुक्षी नाही.
तर खरा मुद्दा आहे तो पुण्यात असलेल्या नानाविध पर्यायांचा .
पण जन्मजात पुणेकरांचा खरा विकपोइन्ट म्हणजे मराठी आणि इतर भारतीय पदार्थ.
मग ते सकाळच्या न्याहारीपासून,जेवणापर्यंत सगळेच.
पण पु.लं.च्या ‘आमच्या वेळचं पुणे आता राहिल नाही’च्या धर्तीवर बोलायचं झालं तर फार मागे नको जायला ,९० च्या दशकाच्या आधी पुण्यात आजच्या एवढे काहीच पर्याय नव्हते हेच खरं.
पुणेकरांना जर हॉटेलमध्ये डोसा खायचा असेल तर वैशाली,रुपाली,तुळशीबागेतले अगत्य,सारसबागेच्या जवळची विश्व,कल्पना ही जोडगोळी. काही ठराविक उडपी हॉटेल्स,बाजीराव रस्त्यावरचं नातूबाग चौकातले ‘वाडेश्वर’,पलीकडचेच ‘जगन्नाथ’, पुढे दक्षिणमुखी मारुतीच्या मागे असलेलं ‘शारदा’ नंतर डायरेक्ट गुंडू शेट्टी ह्यांचे मॉडर्न कॅफे.
जंगली महाराज रस्त्यावर ‘शिवसागर’ सारखा अपवाद सोडला तर इडली,डोसा मिळायची ठिकाणे कमीच होती.
तिकडे स्वारगेट च्या पुढे राहणार्यांना लक्ष्मीनारायणच्या जवळचं त्रिवेणी ,सेव्हन लव्ज चौकातले चंदन.
सातारा रस्त्यावरच्या लोकांना मित्रमंडळासमोरचे ‘राजमहाल’.
कोथरूडकडे राहणार्यांना तर फार काहीच ऑप्शनस नव्हते. नव्यानेच सुरु झालेल्या एम.आय.टी.कॉलेजच्या मुलांकरता नुकतीच सुरुवात झालेलं रत्नप्रभा (आता त्याजागी IDDOS आहे) नाहीतर मग पुढे वनाझच्या समोरच्या बाजूला नव्याने सुरु झालेले किनारा.नळस्टोप जवळचे स्वीकार साधारण ८८साली सुरु झाले,त्याच्या नंतर १-२ वर्षातच ‘समुद्र’.ह्या दोन्ही हॉटेलनी पुणेकरांची पदार्थ खाण्याची सगळी वृत्तीच बदलून टाकली असं म्हणलं तर वावगे ठरणार नाही.म्हणजे आधी पुणेकरांना पावभाजी सारखे पदार्थ खायला फक्त सारसबागच्या शेजारच्या स्टोलवर जायला लागायचे.तेही फक्त संध्याकाळीच.तेच आता अगदी दुपारी पण खाता यायला लागले.त्याच्या शेजारी बसून बरोबरची व्यक्ती खुशाल पंजाबी पदार्थ मागवून खायला लागला.त्याच वेळी तिसरा कोणी दहीवडा खाऊ शकायची सोय झाली.थोडक्यात दिवसभर तुम्हाला नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळे पदार्थ एकाच ठिकाणी मिळायची सोय माझ्या बघण्यात तरी इथेच झाली.
त्यांनतर मात्र पुण्यात ह्या उडुपी पंजाबी हॉटेल्सच पेवच फुटलं.आता एकेका रस्त्यावर जागा मिळेल तशी हि हॉटेल्स उभी राहतात आणि वर्षानुवर्षे चालतात.
पण ९० च्या आधी पुणेकरांची आवडती मिसळ खायची असेल तरी ठराविक ठिकाण होती,म्हणजे टिपिकल पुणेरी मिसळ खायला नारायण पेठेत मुंजाबाच्या बोळात बेडेकरांकडे, नाहीतर तुळशीबागेत जोशी ह्यांच्या श्रीकृष्णमध्ये. श्रीकृष्णमध्ये अगदी घरगुती लोणी लावून ब्रेड स्लाईस पण मिळायचा (त्यावेळी अमूल हे नाव कदाचित कोणी ऐकलंही नव्हतं)
मग लहान मुलांना दोघात एक अश्या प्रमाणात मिळणारी मिसळ खाऊन आम्हाला त्या ब्रेडची भूक लागायची. त्याच्यावर खास मुलांसाठी लोणी आणि वर थोडी साखर पेरून,त्या स्लाईसच्या आंब्यासारख्या ‘Artistic’ फोडी करून ,आणून ते मुलांपुढे ठेवायचे.आम्हाला तेवढी सर्व्हिस म्हणजेपण एकदम रॉयल वाटायची.त्याकाळी सुट्टीच्या काळात मुलांना घेऊन तुळशीबागेत खरेदी आटपल्यावर बायकांचा आवडता कार्यक्रम म्हणजे श्रीकृष्णची ब्राम्हणी पद्धतीची मिसळ किंवा अगत्यमध्ये डोसा खाणे,नंतर शनिपाराच्या चौकात मुरलीधर रसवंती गृहात उसाचा रस प्यायला मुलांना घेऊन जाणे.चैनीची परमावधी म्हणजे ‘कावरे कोल्ड्रिंक’मध्ये कसाटा आईस्क्रीम खाणे.हे एकदा खाल्ले तर त्यावेळी मुलांना निदान सहा महिनेतरी ऐकायला पुरायचे.
आज गिर्हाईकानी ओसंडून वाहणारे शनीच्या पाराजवळचं ‘श्री उपहार गृह’ तेव्हा नुकतच सुरु झालेले होतं.आणि फडके हौद चौकाच्या अलीकडचे वैद्य तेव्हाही (आणि आताही ) बिना तिखट घालता फक्त वाटलेलं आले घालूनच मिसळ करायचे,पण त्या तिखटाचा गोडवा काय वर्णावा ?आज नुकतेच मिसरूड फुटून ब्रॉयलर अंड्यातून बाहेर पडलेले,नवीन खवैये जेव्हा आपल्यालाच वैद्य मिसळीची महती सांगताना रेल्वे ऑफिसच्या शेजारी अशी खुण सांगतात.तेव्हा “माहित्ये मला”असं हसत सांगावं लागतं.
(आतून प्रचंड पुणेरी चिडचिड झालेली असते,आता पुणेरी चिडचिड काय? ह्याचाबद्दल पुन्हा कधीतरी.)
बाजीराव रस्त्याला दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या पलीकडच्या बाजूला ‘मार्केट टी’नावाचं एक उपाहारगृह अजूनही आहे.तिथे भरपूर तर्री मारलेला ‘सँपल’पाव झकास मिळायचा.त्यावर कडक चहा पिवून लोकं तृप्त व्हायची.तशीच कीर्ती अजूनही टिकून आहे ती टिंबर मार्केट मधल्या ‘महेश भुवन’ची.तेवढीच छान मिसळ अजूनही.
गावात म्हणजे पुण्यात राहणारे तिखट मिसळ खाणारे हटकून टिळक रस्त्यावरच्या खन्ना ह्यांच्या ‘रामनाथ ‘मध्ये आवर्जून हजेरी लावायचे.त्यावेळचे रामनाथ म्हणजे पत्र्याची शेड घातलेलं दुकान .त्यावेळच्या पद्धतीनी आत गेल्यागेल्या उजवीकडे छोटेखानी चणीचे हसतमुख मालक खन्ना कधीतरी स्वतःवडे,भजी तळताना दिसायचे.डावीकडे असलेया लाकडी बाकांवर घामाघूम होवून बसलेल्या गिऱ्हाईकांना सरसकट एकच रस्सा वाढला जायचा.फक्त तिखट.पण त्या तिखटाला पण एक झकास चव असायची.त्याच्याबरोबर तोंडी लावायला अगदी सातारा ,कोल्हापूरकडे मिळतो तस्सा मोठ्ठा वडा.पण इकडे गर्दी असायची ती फक्त एकट्या,किंवा मित्रांसोबत येणाऱ्या पुरुषांची,म्हणजे तसे हॉटेल कधी ‘फ्यामेली रेस्तरॉ’ झालेच नाही.टिळक रस्त्यावर दर्दी लोकांसाठी मिसळसाठी तसंच जुने आणि प्रसिद्ध म्हणजे ‘संजीवनी’.त्यांच्या मिसळची चव घ्यायला येणाऱ्या ग्राहकात ‘अभिनव’कॉलेजच्या मुलांची गर्दी जास्ती. 
तसे ठिकाण तिकडे लक्ष्मी रस्त्यावर खरेदी आटपून घरातले सगळेजण खास मराठी पदार्थ खायला म्हणून जायचे ते म्हणजे गणपती चौकाच्या जवळचे सरपोतदारांचे ‘पूना गेस्ट हाऊस’मध्ये.सुग्रास मराठी थाळी पासून ते साबुदाणा खिचडी,अळूवडी,कोथिंबीर वडी पर्यंत सगळे पदार्थ एकाच ठिकाणी म्हणजे त्याकाळी अप्रूपच होतं.
टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळासमोर असलेलं ‘तिलक’पण ९० च्या आसपास सुरु झालेलं होतं.‘तिलकचे’ सामोसे, ब्रेड पॅटीस,आणि चहा आजही तिच चव राखून आहेत.त्यात नंतर पाणीपुरी वैगेरे प्रकारांची भर पडत गेली.
क्रमश:
©अंबर कर्वे,पुणे
पूर्वप्रसिद्धी :- दैनिक पुण्यनगरी-तेजोमय दिवाळी- २०१५

No comments:

Post a Comment