Monday, 11 January 2016

आठवणी शिदोरीच्या
एव्हाना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगमाच्या बद्दल बर्याच जणांचे काही अभिप्राय ऐकले,वाचले असतील.माझा अनुभव त्यातील ‘सपोर्टिंग अॅक्टीव्हीटी’ शिदोरी ह्या उपक्रमाच्याबद्दल. पुण्यात कार्यक्रमासाठी साधारण ८०,००० अतिथी स्वयंसेवक येणार.त्यांना साधारण १ तास ते ८ तास प्रवास करून घरी परत जाताना;बाहेर काही खायला लागू नये म्हणून जाताना त्यांच्याकडे प्रत्येकी १० पुऱ्या,त्याच्याबरोबर पुरेशी शेंगदाण्याची चटणी आणि तिळगूळाच्या दोन वड्या ह्याची शिदोरी,पुणे शहरातून गोळा करून त्यांच्यापर्यंत पोचती करायची होती.अशी संकल्पना जी फक्त रा.स्व.संघाच्याच विचारात असू असते.अजून कुठे असल्याची निदान माझ्यातरी बघण्यात नाही.संघ आपल्या स्वयंसेवकांचा किती विचार करतो ह्याची ही फक्त एक झलक आहे.बर्याच बिगर राजकीय संघटनांच्यासारखी ढाबा,मोटेल संस्कृती संघात नाही,ह्याचेच हे प्रतिक आहे.
माझ्याकडे शिदोरी जमा करायची जवाबदारी घेतल्यावर,काही मेसेज पाठवले आणि परिचितांनी ते तेवढ्याच प्रेमानी पुढे पाठवायला सुरुवात केली.आणि मग सुरु झाला फोनचा सिलसिला.पहिल्यांदा पुण्यातल्या मित्रांना मेसेज मिळाल्यावर त्यांचे लगेचच फोन यायला सुरुवात झाली.
काय रे,आम्हाला तुझ्याकडे असे काम सुरु आहे हे बाहेरून समजणारे का?
हीच का तुझी दोस्ती ?आम्हाला सांगितल असत तर आम्ही काय अडवणार होतो का?
नालायका,शिदोरीच्या नावाखाली सगळ्या पुऱ्या स्वतःच संपवायचा विचार नाहीये ना ?ह्या ह्या ह्या
अजून काय दिवे लावतोयस कार्यक्रमात?ते पण आत्ताच सांगून ठेव.नंतर समजलं तर ग्रुपमधून कायमस्वरूपी हकालपट्टी.वगेरे वगेरे.मित्रांच्या ह्या बोलण्यानी काम करायला मजा येतेच.पण त्याहीपेक्षा मजा सुरु झाली अनोळखी लोकांचे फोन यायला लागल्यावर.साधारण दुसर्याच दिवशी एका वयस्कर बाईंनी फोन केला.नमुनादाखल संभाषण वाचा.
त्या- “कोण अंबर कर्वे ना ?”
मी-‘हो’
त्या-“मी अमुकअमुक बोलत्ये.मला तुझा नंबर माझ्या भाच्यानी पार्ल्यावरून पाठवला,नाव अमुकतमुक.(आपण सध्या सोयीसाठी त्याचे तात्पुरते नामकरण सचिन करूया )
सचिन माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा.तुझा मित्र आहे ना तो ?”
मी-“नाही हो.पण त्यात काय?बोला ना मावशी” (त्यांनी जर परस्पर मला भाच्याचा मित्र ठरवलं तर मी त्यांना मावशी म्हणणे ओघानेच आलं.)
तर
मावशी -“अरे तू ते शिदोरीचं काम बघतोयस ना?
मी-‘हो मावशी’
मावशी -“किती जमा झाल्या रे? जमतायत ना रे व्यवस्थित?"(शब्दात मनापासून काळजी)
मी- “हो मावशी,म्हणजे मी नुकतीच सुरुवात केल्ये,पण नक्कीच जमतील”.
मावशी -“किती कमी पडतायत?”
मी- [काहीच न बोलता फक्त ऑ! ]
मावशी -" हॅलो ,रेंज जात्ये का?काय झालं रे?”
मी-“अहो मावशी ८०,००० जणांसाठी गोळा करण्याचे काम सुरु आहे.त्यात माझ्याकडून कितीचा हातभार लागतो बघायचं”.
मावशी -“काही काळजी नको करूस.आम्ही आहोत ना!आता सांग केटरिंगवाला ठरवलाय का नाही अजून?”
मी(परत ऑ पण थोडा सावरून)“मावशी मेसेज तुम्ही वाचला नाहीयेत का?आपण बाहेरून केटरिंगवाल्यांकडून नाही करून घेणार.आपल्याला पुण्यातल्या घराघरातून शिदोरी गोळा करून द्यायच्या आहेत.त्याचे स्वरूप पुन्हा एकदा सांगू का?"
मावशी-“सांग बरं.मला मेसेज आला,आता नाही वाचत,मेला माझा चष्मा सापडत नाहीये कालपासून.”
मी माझी कॅसेट ऐकवली त्यांना.
मावशी-“अरे बापरे!भलतच मोठं काम दिसतंय.आता कसं होणार?सगळं एकट्याने जमणारे का?
मी-“अहो मावशी,मी ह्यातला अगदी छोटासा घटक आहे.खरंच खारीच्या वाटा उचलायचा आहे.इव्हेंट मी नाही करते.सगळे करणारा रा.स्व.संघ आहे.मी राहतो त्या रामबाग कॉलनी मधून जेवढ्या जमतील तेवढ्या शिदोरी गोळा करून द्यायची जवाबदारी मी घेतल्ये एवढंच.माझ्यासारखे शेकडो लोक पुणे शहरात आपापल्या भागात हे काम करतायत.काम मोठं आणि छान होणारे नक्की.”
मावशी-“हाहाहा मग बरं आहे.मला वाटलं..”
मी-आपण किती शिदोरीसाठी हातभार लावू शकता,सांगता?
मावशी-“हा तर ऐक.मी राहते कोथरूडमधे,म्हणजे जवळच रे तुझ्या घराच्या."
मी-‘हो’
मावशी-मी ३०-४० जणांचा उपमा नक्कीच बनवून देते.कसा आणि कुठे देवू ते सांग.
मी-परत ऑ..पण परत सावरून अहो मावशी आपल्याला तिखटमिठाच्या पुर्या द्यायच्या आहेत ना?त्याच्याबरोबर पुरेल एवढी शेंगदाण्याची चटणी.आणि दोन तिळगुळच्या वड्या.बास.बाकी काहीच नाही द्यायचं आपल्याला !
मावशी(न ऐकल्यासारखं करून)-ते ठीके रे.पण काही जणांना तेवढाच बदल होईल.सगळ्यांच्या डब्यात तेचतेच असेल तर गंमत येणारे का?तूच सांग.त्यापेक्षा सगळ्यांना थोडी व्हरायटी होईल.वाटून घेतील मुलं.
मी(काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळून नकळतपणे) -‘हं...अहो पण..
मावशी-“मला सांग कधी द्यायचय सगळं?"
मी-" दोन तारखेला.पण अहो मावशी आपल्याला पुऱ्याच द्यायच्या आहेत ओ."
मावशी(तरीही विक्रमादित्याच्या वरताण हट्टाने ,nonstop )हे बघ,अरे माझ्या हातचा उपमा म्हणजे आमच्याकडे मेजवानी असते.माझ्या मुलांचे म्हणजे मुलं आता अमेरिकेत असतात,पण त्यांचे सगळे मित्र पण अजूनही आठवण काढतात माझ्या हातच्या उपम्याची. पाहिजेतर तू आधी एकदा खायला ये उपमा माझ्या हातचा.नाही आवडला तर मग नाही देत मी.
मी ( ऑलमोस्ट रडकुंडीला येवून )-“मावशी,त्याच्याबाबतीत मला काहीच नाही म्हणायचंय ओ.खूपच छान होत असणार.पण आपल्याला आत्ता फक्त सांगितलेला मेन्यू तयार करून द्यायचा आहे.तो पण प्रत्येक घरातून शक्यतो १ शिदोरी.
मावशी (आता थोड्या रागात) हे बघ.माझे वडील पण संघात होते.मीपण लहानपणी समिती मध्ये जायचे.आमचे ‘हे’ पण पूर्वी संघाचे काम करायचे.मला माहिती आहे संघ कसा असतो ते.आता ऑपेरेशन नंतर हे घरीच असतात.नाहीतर असा शिवशक्ती संगम होतोय म्हणल्यावर न चुकता गेले असते.त्यामुळे आमचा काहीतरी हातभार लागलाच पाहिजे.मी शिदोरी देणार म्हणजे देणार.”
मी-“मावशी,अहो नक्कीच द्या.मी स्वतः तुमच्या घरी येवून घेऊन जाईन,फक्त १० च्या पटीत जमतील तेवढ्या पुऱ्या,चटणी,आणि प्रत्येक शिदोरीच्या बरोबर वड्या घालून द्या.बास.आता सांगा किती शिदोर्या द्यायला जमतील?मी तुमच्याकडे तेवढे पॅकिंगचे मटेरियल पोचवतो.
मावशी-“अरे तेच तर सांगत्ये ना!! मला आता पुऱ्या उभं राहून तळायला अवघड जातं.सध्या माझी नेहमीची बाईपण रजेवर आहे,तिच्या मुलीचे लग्न आहे नेमकं.त्याचवेळी आलंय अगदी.ती असतीतर काळजीच नव्हती मला.
मी-(हे सगळं त्यांनी कधी सांगितलं मला? ह्या संभ्रमात)हो मग सांगा काय करता येईल?
मावशी-“पुऱ्या तळून देणारी बाई आहे का रे कोणी माहितीत? "
मी-“माझ्या? "(परत ऑ वासलेला)
मावशी-"नाहीतर काय? संघाची माणसं तुम्ही.तुमच्या ओळखीत तर हल्ली पंतप्रधानही असतात.हाहाहा. येवढं माणूस शोधायला काही जड नाही तुम्हाला.म्हणजे बाईचे पैसे मीच देणार,फक्त तुमच्या माहितीत कोणी असेल तर सांग.एकच दिवस काम.मी कणिक मळून आणि पुऱ्या लाटूनपण देईन.तिने फक्त तळून द्यायच्या.चांगली वाटली तर माझ्याकडे अधूनमधून स्वयपाकाला पण बोलवत जाईन तिलाच.शक्यतो गरजूच बघ हा.म्हणजे तेवढीच एखाद्या गरिबाला तरी मदत जाताजाता.ऐकतोयस ना?”
मावशी अक्षरशःधोधो बरसत होत्या.मी त्यांचा उत्साह ‘ऐकून’ थक्क होवून फक्त ऐकत बसलो होतो.
मावशींना कोणी असेल तर कळवतो असं सांगितलं.नंतर फोन ठेवून विचार करायला लागलो. केवढी ती लोकांची इच्छाशक्ती ?ज्यांची मुलं परदेशात,नवरा अंथरुणावर,कोणाचीही काम करायची सक्ती नसताना कोण सांगते ह्यांना ही कामे करायला ?
हा फोन तर फक्त प्रातिनिधिक होता.असे कितीतरी लोक फोनवर बोलले,येवून प्रत्यक्ष भेटले.अश्याच एक बाई,कदाचित त्यांना आवडणार नाही म्हणून,त्यांचे नाव सांगत नाही.दोनतीन वेळा फोन केला,पण भेटायला येवून शिदोरीचे पॅकिंगचे मटेरियल घेऊन जाणे बहुदा काही जमत नव्हतं त्यांना.मी आणून देवू का विचारलं तर नको म्हणाल्या.एकदा मी घरातून बाहेर पडणार नेमका त्याचवेळी पुन्हा एकदा त्यांचा फोन आला.मी आधीच्या अनुभवावरून थोडा त्रासलेल्या आवाजात आज तरी नक्की येणार ना?अशी खात्री करून घेतली आणि घरी थांबलो.त्यादिवशी मात्र त्या ठरल्याप्रमाणे आल्या.बघितलं तर त्या पोलियो रुग्ण.दोन्ही पायात कॅलिपर्स घालून बाहेर रिक्षा वेटिंगला थांबवून माझ्या घरी आत आल्या होत्या.मला त्या माउलीच्या हातात पॅकिंगचे मटेरियल देताना भरून आलं.त्यांनी मात्र हसतमुखाने ते कंटेनर घेवून सांगितलेल्या वेळात,त्यात सगळी शिदोरी भरून ते परत आणून देखील दिले.तेवढेच सहजतेने.केवढेतरी वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे अनुभव.
कशी ही माणसे फक्त संघाच्या कार्यक्रमाचे नुसते नाव ऐकलं तरी स्वतःचे सगळे आजार विसरतात आणि एखाद्या तरुणाच्या उत्साहाने काम करतात?कोण आहे ह्याच्या मागे?ही तळमळ बघायची असेल तर आपल्याला संघातच जायची गरज आहे,असं बिलकुल नाही.फक्त पूर्वग्रहदुषित नजर नसेल त्या प्रत्येकाला ही भावना सर्वसामान्य जनतेमध्ये दिसून येईल.संघ ज्या निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम करतो.प्रत्येक आपत्तीमध्ये संघ स्वयंसेवक ‘कार्यामध्ये’ सगळ्यात पुढे दिसतात.त्यांच्यासाठी काहीतरी करायची,त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवायला समाजातला प्रत्येक घटक उत्सुक असतो.फक्त नजर स्वच्छ पाहिजे,संघाच्या कामासारखी.
तर संघाच्या इतिहासातला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा कार्यक्रम जसा ठरवला तसाच्या तसा पार पडला.एका जागेवर साधारण लाखभर लोक दिलेल्या जागेत शांतपणे राहतात.तिथे जेवण करतात,तिथे त्यांचे संचलन होतं.दुसर्या दिवशी जवळपास दोन लाख स्वयंसेवकांच्या समोर , त्या संघटना प्रमुखांचं भाषण होतं,त्यावेळी अक्षरशः टाचणी पडेल तर त्याचा आवाज होईल एवढी शांतता असते.
' देश पहिला , देशकार्य सगळ्यात मोठे ' हे पुन्हा एकदा मनावर ठसवले जाते .कार्यक्रम संपतो .
कार्यक्रम बघायलाही जवळपास पाउण लाख लोक आलेले असतात .त्यांच्या जाण्यायेण्याची सोय तेवढीच व्यवस्थित केली जाते,ती पण त्यांच्याकडून माफक पैसे घेऊन (आणि इतर राजकीय सभा आयोजित करणाऱ्या लोकांसाठी विशेष म्हणजे, कोणाला येण्यासाठी पैसे द्यायला नाही लागत)
होऊ शकतं हे असं काही भारतीय सैन्यदल सोडून इतर कुठल्याही राजकीय / बिगर राजकीय संघटनेत ?
हे वाचणार्या आणि वेगळी राजकीय विचारधारा असलेल्या माझ्या मित्रांनी ह्याचे उत्तर आपल्या मनालाच द्यावे हे चांगलं . कारण उत्तर सगळ्यांनाच माहित्ये , फक्त मान्य करणे सगळ्यांना जमेल असं नाही .
ह्या आयोजनासाठी १०,००० संघस्वयंसेवक सहा महिन्यांपासून अविरत कष्ट घेत होते.सगळ्यांची भावना एकंच,संघासाठी काम करणे ,बास त्यांच्यासाठी विषय संपला.
मलातर केवढीतरी चांगली माणसे ह्या निमित्तानी नव्याने भेटली.शिदोरी बनवून देणाऱ्या बर्याच जणांनी पॅकिंग करून आमच्या घरी व्यवस्थित आणून दिले.त्या सगळ्यांचे वैयक्तिक आभार मानणे मुश्कील आहे. संघाचे स्वयंसेवक तर माझ्याच नाही तर प्रत्येक फोनला ज्या तत्परतेने उत्तर देत होते ,त्यातून प्रत्येक कॉलसेंटरवाल्यांनी शिकावे. माझ्यासारख्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यासाठी तर हा सगळा प्रोजेक्टच, मॅनेजमेंटचे शिक्षण देणारा आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.त्याविषयी पुन्हा कधीतरी.
पण ज्या आपुलीकीने ह्या सगळ्यांनी हे काम मार्गी लावले,त्याला तोड नाही.ह्या ‘शिवशक्ती संगमाच्या’ सगळ्या मानकर्यांना माझा त्रिवार मुजरा !
अंबर कर्वे , पुणे
९.१.२०१६
Photos Courtesy  from Internet 

No comments:

Post a Comment